यवतमाळ (यवतमाळ लाईव्ह न्यूज): यवतमाळ शहरातील पाटीपुरा भागात धारदार शस्त्राने वार करून एका तरुणाची हत्या करण्याच्या घटनेत यवतमाळ पोलिसांच्या डीबी पथकाने तातडीने कारवाई करत काही तासांतच तीन आरोपींना पकडले. प्राथमिक तपासात हे खून मोबाईल आणि अवैध संबंधांच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे. मृतकाचे नाव सहजाद अली मुजफ्फर अली (वय २१) असून, तो अशोक नगरचा रहिवासी होता.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये इरफान अली ऊर्फ इरफान लेंडी सय्यद बरकत अली (वय ४९, रहिवासी अशोक नगर), सय्यद अकिल सय्यद आसिफ ऊर्फ टोबो (वय २२, रहिवासी तहसीलसमोर, इंदिरानगर, घाटंजी) आणि सय्यद अमन सय्यद आरिफ (वय २५, रहिवासी अशोक नगर) यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतकाने आपला मोबाईल सहा हजार रुपयांसाठी आरोपी अमनकडे गिरवी ठेवला होता.
मोबाईल परत मागितल्यावर वाद झाला आणि त्यातून हत्या झाली. पोलिसांनी तीन आरोपींना काही तासांतच पकडले. जेव्हा सहजादने पैसे देऊन मोबाईल परत मागितला, तेव्हा अमनने मोबाईल खराब झाल्याचे कारण सांगून देण्यास नकार दिला आणि दोघांमध्ये भांडण झाले. याशिवाय, सहजादने अमनच्या पत्नीशी अवैध संबंध असल्याचा आरोप केला होता आणि अमनने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. १६ ऑक्टोबर रोजी दुपारी आंबेडकर नगर पाटीपुरा येथे आरोपींनी एकत्र येऊन सहजाद अलीवर हल्ला केला आणि चाकूने वार करून त्याची हत्या केली.
घटनेनंतर पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल केला. ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद सरकटे, पीएसआय गणेश सपकाळ, रावसाहेब शेंडे, प्रदीप नाईकवाडे, किरण पडघन, मिलिंद दरेकर, अभिषेक वानखडे, गौरव ठाकरे, पवन नांदेकर आणि प्रदीप कुरडकर यांनी केली. एकाला जामीन, दोघांना पोलिस रिमांड
शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या सूचनेनुसार डीबी पथकाने आरोपी सय्यद अमन सय्यद आरिफला घाटंजी येथून पकडले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर इरफान अली ऊर्फ लेंडी बरकत अली आणि सय्यद आरिफ सय्यद सलीम यांना त्यांच्या गावातून अटक करण्यात आली. शुक्रवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता, एका आरोपीला जामीन मंजूर झाला तर दोघांना १९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस रिमांड देण्यात आले.











